नेपाळमध्ये भारत व पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर निदर्शने   

मानवाधिकार गटाकडून शांततेचे आवाहन 

काठमांडू : नेपाळच्या मानवाधिकार गटाने शुक्रवारी भारत आणि पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली. यावेळी दोन्ही देशांना दक्षिण आशियात सुरू असलेला तणाव संपवून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
मानवाधिकार आणि शांती सोसायटीने कार्यकर्ते कृष्णा पहाडी आणि  हरपेसच्या अध्यक्ष रेणुका पौडेल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. या गटांनी दहशतवादाचा निषेध केला. यावेळी दोन्ही देशांसाठी शांतता हाच एकमेव मार्ग आहे यावर त्यांनी भर दिला. युद्धात कोणीही जिंकणार नाही, फक्त मानवतेचा पराभव होतो, दहशतवाद नेहमीच निंदनीय असतो, शांततेत सर्वांचा विजय होईल आणि दक्षिण आशियाला युद्धमुक्त क्षेत्र बनवूया, अशा घोषणा लिहिलेले फलक त्यांनी हातात घेतले होते.
 
सिंधू पाणी करार स्थगित करण्यावर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना पाकिस्तानने केलेल्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. सिंधू पाणी करार स्थगित करणे कायदेशीर आहे? पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणार्‍यांना पाकिस्तानने का संरक्षण दिले? आणि पाकिस्तान दहशतवादाला का आश्रय देत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारत सरकारला उद्देशून एक निवेदन काठमांडूमधील भारतीय दूतावासाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले. 

Related Articles